आपल्यासारखे आपणच

जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते माझ्या मते त्यासाठी तिच्या ‘जवळचे‘ लोक जास्त जबाबदार असतात. एखाद्या व्यक्तीला असे विचार करण्यापासून रोखणं आपल्या आवाक्यात नसेलही पण ते विचार वळविण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आणि अशा काहीशा विचारात असणाऱ्या व्यक्तीसोबत वागताना केलेली एखादी लहानातली लहान गोष्ट(विशेषतः त्या व्यक्तीच्या ‘जवळच्यांची’) तिला तिचे विचार कृतीत उतरवण्यास प्रवृत्त देखील करू शकते. कारण कोणीच असा निर्णय स्वखुशीने घेत नसतं. त्यामुळे बोलताना, वागताना समोरच्याचा विचार करून वागा. आपण कितीही म्हटलं फ्रेंड्समध्ये काय एवढा विचार करायचा, इतना चलता है वगैरे तरीही शेवटी प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या त्या व्यक्तीच्याही कळत नकळत परिणाम होतोच असतो.
लिहिण्याचं विषेश असं काही कारण नाही.
आणि जर तुमच्या मनात कधी असा विचार आलाच तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमची जागा या संपूर्ण जगात कोणीच घेऊ शकत नाही. मी फक्त कोणाच्या आयुष्यात नाही बोलत… संपूर्ण जगात! कारण जरी आपण बेस्ट नसलो तरी वेस्ट तरी नक्कीच नाही. आपण या जगातील सर्वात सुंदर, हुशार, महान, चपळ नसू पण मी ‘मी’ आहे, तुम्ही ‘तुम्ही‘ आहात. आणि या जगात प्रत्येक जण हा वेगळा आहे, हेच तर सर्वात मोठं साम्य आहे. ही विभिन्नता तशी प्रत्येक गोष्टीत दिसून येते पण आपल्याला नसेल जाणवत तर निदान एवढं तरी मान्य करावंच लागेल की आपला प्रत्येकाचा डी.एन.ए. वेगळा आहे. तुमच्यासारखीच दिसणारी, बोलणारी, वागणारी, विचार करणारी, हसणारी, चालणारी, रागावणारी, ओरडणारी, समजून घेणारी, समजावणारी आणि रडणारी देखील व्यक्ती होणे नाही. आपल्याला आपल्यातील काही गोष्टी वेगवेगळ्या प्रमाणात इतर अनेकांमध्ये आढळून येतील पण त्याने ते फक्त ‘आपल्यासारखे‘ होतात, ‘आपण‘ नाही..!